बौध्द राज परंपरा ...
व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला, विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार करणारी 19 विद्यापीठे निर्माण झाली व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद्ध विद्यापीठांनी केले. भारत याच काळात खऱ्या अर्थाने महासत्ता होता. सोन्याचा धूर याच काळात भारतात निघत असल्याचे अतिशोक्तीने म्हटले जाते. भारत सुवर्णभुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता तो बौद्ध भारत, बुद्धिचा भारत होता. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणान ंतर भारतात मगधाचा राजा बिंबिसार त्यानंतर त्याचा पुत्र अजातशत्रू व कोसलचा राजा प्रसेनजित, त्याचा मुलगा विड्डुभ हे राजे झाले. विड्डुभाने बुद्धांच्या हयातीतच बुद्धाचा वंश असलेल्या शाक्यांचे शिरकाण केले होते. पुढे त्याचा एका लढाईत वाहून मृत्यू झाला. तर त्याचे राज्य 'कोसल' मगधाचा राजा अजातशत्रूने काबीज केले. ह्या अजातशत्रूने बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. त्यावेळी मगधचा (बिहारचा) राजा भारताचा सर्वात शक्तीशाली राजा ओळखला जाई. अजातशत्रू नंतरचे राजे हे प्रभावशाली नसल्याने नंद वंशाने राज्य बळकावले. नऊ नंद राजे हे मगधचे राजे झाले हे बौद्ध धर्मीयच होते. नऊ नंदातील धनानंद राजाच्या विरोधात त्याच्या 'मुरा' नावाच्या दासीचा पुत्र चंद्र गुप्त मौर्य याने बंड केले आणि मौर्य घराण्याची सत्ता सुरु झाली. याला प्रामुख्याने बुद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती कारणीभूत होती. म्हणूनच तात्कालीन शुद्र असलेल्या चंद्रगुप्ताची राज्यक्रांती झाली. चंद्रगुप्तचा काळ इ. स. पूर्व 324 ते इ. स. पूर्व 300 त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार राजा झाला. सम्राट चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसार हे दोघेही बौद्ध धर्मीय नव्हते; परंतु चंद्रगुप्ताचा नातू जगविख्यात सम्राट अशोकाने बौद्ध धम्म स्विकारुन त्याचा प्रचार व प्रसार केला. त्याच्या काळात बौद्ध धम्माची तिसरी संगती झाली. बुद्ध ते अशोक या अडिचशे वर्षात बौद्ध धम्मात 18 पंथ निर्माण झाले. अशोकाचा मार्गदर्शक आचार्य मोग्गली पुत्र तिस्स यांनी 17 पंथाचे मिथ्या विचार खोडून थेरवादाचा पुरस्कार केलेला 'कथावत्थु' हा ग्रंथ लिहला. धम्म प्रचारार्थ सम्राट अशोकाने अनेक प्रचारक नेमले इतकेच नव्हे तर आपले अपत्य महेंद्र व संघमित्रा यांना सिंहलद्विपात बौद्ध भिक्षु बनवुन पाठविले. इतका त्याग इतके झोकून देणे जगाच्या इतिहासात कोणालाही जमलेले नाही. अशोकाने 35 वर्ष राज्य केले. जगाच्या कल्याणासाठी व मानवतेसाठी त्याने आपले आयुष्य समर्पित केले. मौर्याचा शेवटचा राजा सहावा वंशज बृहद्रथ हा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता शुंग वंशातील पुष्यमित्र नावाच्या एका सेनापतीने इ. स. पुर्व 184 मध्ये त्याला कपटाने ठार मारले आणि मौर्याचे राज्य बळकावले. जरी उत्तरेत मौर्याचे राज्य संपुष्टात आले होते, तरी महाराष्टात त्यांची छोटी-छोटी राज्ये बराच काळापर्यत अस्तित्वात होती. चालुक्य घराण्यातील दुसऱ्या पुलकेशीने कोकणातील मौर्याचा इ. स. 625 च्या सुमारास विशेष प्रयास न करता पराभव केला. या मौर्य वंशातील कोणी पुरूष कोकणात येऊन राहीले व तेथे त्यांचा विस्तार झाला. तोच 'मोरे' आडनावाचा वंश होय असे म्हटले जाते. अशोक नंतर बौद्ध धम्माचा आश्रयदाता सम्राट कनिष्क झाला.
वर सांगितल्या प्रमाणे बौद्ध धम्मात अनेक पंथ निर्माण झाले, परंतु बुद्ध धम्मातील निरनिराळ्या पंथातील मतभेद मिटवून धम्मसुत्रांचे आणि संघ नियमाचे एक सुत्रीकरण करण्यासाठी सम्राट कनिष्काने चौथी धम्म संगिती साधारणपणे इ. स. 100 साली भरवली. सम्राट कनिष्क हा कुशाण वंशाचा होता. इ. स. नंतर 78 सालापासून सुरु झालेले सक संवत्सर कनिष्कानेच सुरू केले ते सध्या सुद्धा मानले जाते. हे शक दुसऱ्या कोणीही ते सुरू केले असल्याबद्दलचा ठोस ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संगने लिहून ठेवलेल्या प्रवास वर्णनावरुन कनिष्काने बुद्ध धम्माचा स्विकार केल्यावर धम्म शिकवण्यासाठी त्याने एका भिक्खूला सांगितले. त्या भिक्खूच्या शिकविण्यात धम्म तत्वातील असलेले मतभेद कनिष्काच्या लक्षात आले, म्हणून त्याने भन्ते पार्श्वाच्या सल्लावरुन कनिष्काने चौथी धम्म संगिती भरविली. ह्या संगितीचा अध्यक्ष वसुमित्र होते. 'सांकेत' येथे राहत असलेल्या अश्वघोषाला संगितीत भाग घेण्यासाठी बोलावले होते. त्याने त्या संगितीचा उपअध्यक्ष म्हणून काम केले. ही संगिती कश्मीर येथे भरली की, जालंधर येथे याबाबत विद्वानांत मतभेद आहेत. सम्राट कनिष्काने पाचशे धम्म पारंगत विद्वान भिक्खूंना राहण्यासाठी एक मोठा विहार बांधला. त्या भिक्षूंनी त्रिपिटकावर भाष्ये तयार केली. सुत्तपिटकावरील भाष्य एक लाख श्लोकांचे, विनयपिटकावरील भाष्य 'विनयविभाषा' ह्या नावाने तयार केले. त्यात एक लाख श्लोक आहेत, त्याचबरोबर 'अभिधम्मविभाषा' या नावाने अभिधम्मावरिल भाष्याचे एक लाख श्लोकात संघायन केले. या तिन्ही भाषांची एक प्रत ताम्रपटलावर लिहून काढून ते ताम्रपटल पाषणाच्या करंडातून ठेवून त्यावर कनिष्काने एक स्तूप बांधला अशी नोंद आहे. अशोकाने भरवलेल्या तिसऱ्या धम्म संगीतीत विभाज्यवादी म्हणजे थेरवादी बौद्धांचे प्राबल्य होते. तर कनिष्काने भरविलेल्या संगितीत सर्वास्तिवादी म्हणजे महासांघिक बौद्धांचे प्राबल्य होते.
मौर्याच्या काळापासून इ. स. 300 वर्षापर्यत धर्माशी प्रत्य्क्ष संबंध असलेल्या ज्या गोष्टी पुराणवस्तू संशोधनात सापडल्या आहे. त्यातील बहुतांश बौद्ध धम्माशी संबंधित आहेत. त्या प्रामुख्याने लेणी, स्तुप, बुद्धमुर्ती, नाणी आणी शिलालेख आहेत. दगड विटांनी आणि लाकडांनी बांधलेले चैत्य, विहार, बुद्धविहारे इत्यादी इमारती संपूर्ण भारत भर विखुरले आहेत. बुद्धमुर्ती या कनिष्काच्या काळात बनल्या गेल्याचे दिसते.
याच दरम्यान पेशावर ते वायव्य भारतावर ग्रीक राजा मँनडर उर्फ मिलिंद या राजाने भन्ते नागसेनाकडून बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. त्याची साक्ष देणारे असंख्य अवशेष आज वायव्य भारतात उपलब्ध आहेत. कनिष्क आणि मिलिंदानंतर सातवाहन राजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिलेला दिसतो. त्याचे साम्राज्य इ. स. पूर्व ते इ. स. 218 पर्यत तिनशे वर्षा अधिक काळापर्यंत, पूर्वेस बंगालच्या उपसागरापासून ते पश्चिमेस अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. उत्तरेस मौर्याच्यानंतर शुंग, कण्य, कनिष्क अशी घराणी उलथापालथ होऊन जरी राजकीय अस्थिरता आली होती. तरी दक्षिणेत सातवाहनांचा काळामधील 50 वर्षे सोडली तर शांततेचा आणि समृद्धीचा गेला. एक छत्री साम्राज्य असल्यामुळे देशातील निरनिराळ्या जमाती एकत्र येण्यात आणि त्यांचे राजकीय तसेच सांस्कृतिक अभिसरण होण्यास मौर्याच्या कारकिर्दी प्रमाणेच सातवाहंनाचा काल अत्यंत अनुकूल होता. महाराष्टात आता पर्यंत सापडलेल्या सातवाहनांच्या काळातील धार्मिक वास्तू आणि शिल्प, एखादा अपवाद वगळता, फक्त बौद्ध धर्मियच आहे. गुप्तकालीन भारत हि समृद्धीत पोहचला होता. नालंदा विद्यापीठाची भरभराट या काळात होती. अनेक गुप्तराजांनी बौद्ध धम्माचा राजाश्रय देवून बौद्धांचे प्राबल्य कायम ठेवले.
बौद्ध धर्माचा शेवटचा महान सम्राट हर्षवर्धन यानेच बौद्ध धम्माची जागती ज्योत तेवत ठेवली. याने बौद्ध धम्माच्या स्विकारल्यानंतर आपले नाव 'शिलादित्य' असे ठेवले. या सम्राटाने इ. स. 624 मध्ये कानोज येथे बौद्ध धम्म सभा घेतली. या देशात नालंदा हे मुख्य विद्यापीठ होते. या ठिकाणी अध्ययनासाठी देशातून लोक येत. याच काळात हु-एन-त्संग ही चीनी प्रवासी आला होता. ओरिसा प्रांतातही बौद्ध धम्म अद्याप होता. पश्चिमेकडे गुजरात, खानदेश व कोकणाचा काही भाग यावर वल्लभी राजांचा अंमल असे.हा सगळा प्रदेश बौद्ध धम्मी होता. कोसल म्हणजे नागपूर येथे ही बौद्ध धम्माची भरभराट होती. दक्षिणेकडे कलिंग व तैलगण या प्रदेशावर सर्वत्र बौद्ध धम्म प्रचलित होता. हर्षवर्धनापर्यत भारत हा इ. स. 580 पर्यत बौद्धमय होता. आठव्या शतकात महाराष्ट्रात झाला. आठव्या नवव्या शतकात भारतात बौद्ध धम्माची सर्वत्र पिछेहाट झाली. तरी सुद्धा महाराष्ट्रात बराच काळापर्यंत बौद्ध धम्म अस्तित्वात होता. "प्रबोध चंद्रोदय" हे संस्कृत नाटक बाराव्या शतकात रचले गेले. त्या नाटकाच्या रचनेच्या काळी.."प्रबोध चंद्रोदय " हे संस्कृत नाटक बाराव्या शतकात रचले गेले. त्या नाटकाच्या रचनेच्या काळी बौद्ध धम्म ऱ्हासाच्या पंथाला लागला होता. पण नामशेष झाला नव्हता. असे अनुमान या नाटकावरुन आपणास काढता येते.
इसवी सनाच्या 13 व्या शतकात म्हणजे 1276 साली श्रावस्ती येथे एक बौद्ध विहार बांधण्यात आले. 14 व्या शतकात म्हणजेच 1331 साली बुद्धगया येथील बौद्ध विहारांची डागबुजी करण्यात आली. 15 व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे इ. स. 1485 वर्षी नवद्विपात वैष्णव शिरोमणी चैतन्यदेव यांचा जन्म झाला. त्यावेळी हिंदूनी तर महोत्सव केलाच पण बौद्धांनी सुद्धा केला, असे चैतन्याचा एक चरित्रकार लिहतो यावरुन त्यावेळेपर्यंत बरेच ठिकाणी थोडे फार तरी बौद्ध होते, असे दिसते.
16 व्या शतकात पुर्वार्धात भारतात बौद्ध शास्त्रांचे अध्ययन कोठे-कोठे चालत असे त्यासमयी बंगाल मधील एका कत्यायन गोत्री ब्राह्मणाला त्याची बौद्ध धम्माकडे प्रवृत्ती दिसल्यावरून त्याला गावकरांनी काडून टाकले होते. हा ब्राह्मण पुढे उघड रितीने स्वत: ला बौद्ध म्हणवून आणि 'बुद्ध ग्राम चक्रवर्ती' हे नाव धारण करुन सिलोन मध्ये गेला तेथे त्यांच्या विद्वतेबद्दल लोकांनी सत्कार केला. याच शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध तिबेटी लामा तारानाथ यांनी भारतात बौद्ध धम्माची स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी मुद्दाम दोन वकिल तिकडे पाठवले होते. त्यांनी इकडे बारकाईची चौकशी करून असा रिपोर्ट केला की, ओरिसा व पश्चिम बंगाल या प्रांतात अद्याप बौद्ध धम्म जीव धरुन होता. अशा रितीने तब्बल 17 व्या शतकापर्यंत भारतात बौद्ध धम्म बराच काळपर्यंत तग धरुन होता. इ. स. 1539 मध्ये पोर्तुगीज पाद्री फाद अँन्टेनिओ-डी- पोटों याने येथील भिक्षूंना ख्रिश्चन केल्याची नोंद आहे.
वरील इतिहासाचे अवलोकन केल्यावर लक्षात येते की, इ. स. पूर्व 6 व्या शतकपासून इ. सनाच्या 6 व्या शतकापर्यंत म्हणजे बुद्ध काळापासून हर्षवर्धनापर्यंत भारत हा बौद्धमय होता व असंख्य बौद्ध राजांनी भारतावरती राज्य केले. बाराशे वर्षे व आठव्या शतकात सामाजिक व संस्कृतिक दृष्टया हा धर्म बलशाली होता हे दिसते. आठव्या शतकानंतर बौद्ध धम्माला उत्तरती कळा लागली. तरी ही 12 व्या शतकापर्यंत हा धम्म व ज्ञान देणारी विद्यापीठे अस्तित्वात होती. 1200 वर्षाचा बौद्ध साम्राज्याचा सुवर्ण इतिहासातून आपल्या पूर्वजांच्या गौरवशाली कर्तृत्वाचे आकलन होते. या देशाला महासत्ता बनवण्याचे काम आमच्या बौद्ध पूर्वजांनी केले आणि भारताला सुवर्ण भूमी आणि वंदनीय भूमी बनविले. जय भीम.
No comments:
Post a Comment